खर्जासिंग व काजीसिंग हा १८३१-५७ काळात कंपनीच्या सेवेत होता. एका कैद्याला त्याने केलेल्या मारहाणीत कैद्याचा मृत्यू झाला. त्यामुळे काजीसिंगला १० वर्षांची शिक्षा झाली. १८५५ मध्ये तो बाहेर आल्यावर इंग्रजांनी पुन्हा त्याला नोकरीत घेतले. कॅप्टन बर्च व कॅप्टन रिसालदार यांनी काजीसिंगला शिवीगाळ केल्याने त्याने नोकरी सोडली. १८५७ मध्ये १५०० पेक्षा जास्त भिल्लांनी खर्जासिंग व भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. सप्टेंबर १८५७ मध्ये भिल्लांनी भीमा नाईकच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कॅनेडीच्या पार्टीवर हल्ला केला. सरकारने भीमा नाईक यास पकडण्यासाठी १००० रुपये बक्षीस ठेवले. २९ ऑक्टोबर १८५७ रोजी भीमाने सिरपूर व १ नोव्हेंबर १८५७ रोजी भीमा व खर्जासिंगने दोन खेड्यांवर हल्ला करून ती लुटली. खर्जासिंगने ३०० भिल्लांसह सिंध्वा घाटात होळकर हद्दीत बैलगाड्यातील ७ लाखांचा खजिना व ६० अफूच्या गाड्या लुटल्या. सरकारी पोस्त व टेलीग्राफ तारा मोडल्या. नंतर त्यांना धारच्या सेनेतून मोकळे झालेले मक्राणी विलायती (पठाण) येउन मिळाले.
११ एप्रिल १८५८ रोजी मेजर इव्हान्सन, कॅप्टन बर्च, लेफ्टनंट वासवी यांनी
अंबापाणी येथे काजीसिंग, दौलतसिंग
व काळूबाबा यांच्यावर हल्ले केले. या लढाईत भिल्ल स्त्रियांनीही सहभाग घेतला.
तिन्ही इंग्रज अधिकारी जखमी झाले पण सुमारे ४०० भिल्ल स्त्रिया पकडल्या गेल्या.
भागोजी, भीमासिंग
व खर्जासिंग मिळेपर्यंत त्यांच्या बायकांना ओलीस ठेवण्याचा मुंबई सरकारचा आदेश
होता. अंबापाणी लढाईत ड्रम ट्रायलने खटले होऊन ६२ पैकी ५७ आरोपींना गोळ्या
घालण्याचा निर्णय देण्यात आला. बदला म्हणून अहमदनगरचे ४०० भिल्ल नांदगावजवळ जमले.
लेफ्टनंट स्टुअर्ट ३०० सैनिकांसह निघाला. २० एप्रिल १८५८ रोजी नांदगाव जवळील लढाईत
स्टुअर्ट मारला गेला.