कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. या भागातील भरपूर नद्या आणि सुपीक जमीन यामुळे मुख्यत: शेतीवर आधारित उद्योग असूनही कोल्हापूर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जातो.
चतुःसीमा
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे. त्याच्या पश्चिम-नैऋत्येला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम-वायव्येलारत्नागिरी जिल्हा, उत्तर-ईशान्येला सांगली जिल्हा तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीचीरांग असून तेथील भाग डोंगराळ आहे.
भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे पश्चिम रांग , मध्य रांग आणि पूर्व रांग असे तीन विभाग मानले जातात. मध्य आणि पूर्व भागातील माती अग्निजन्य खडकापासून बनली असल्याने काळ्या रंगाची आहे तर पश्चिम भागात घाटातील डोंगराळ भागातील जांभ्या खडकापासून बनलेली लाल माती आहे. या भागातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापली आहे.
जिल्ह्यात पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून पश्चिमेकडे वाहते.
दळणवळण
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून आनुषंगिक फायदे होत आहेत.
कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.
तालुके
· आजरा
· करवीर
· कागल
· गगनबावडा
· गडहिंग्लज
· चंदगड
· पन्हाळा
· भुदरगड
· राधानगरी
· शाहूवाडी
· शिरोळ
· हातकणंगले
ऐतिहासिक महत्त्व
कोल्हापूर ज्या मूळ गावापासून विस्तार पावले ते गाव ब्रह्मपुरी होय. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूरच्या आसपास केलेल्या उत्खननात, तेथील पुरातन अवशेषांवर सातवाहनकालीन व बौद्ध धर्माच्या खुणादेखील आढळल्या आहेत. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च, १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खर्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.
राजकीय संरचना
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व १० विधानसभा मतदारसंघ आहेत.
लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर, हातकणंगले.
विधानसभा मतदारसंघ : चंदगड,राधानगरी, कागल,कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ.
तसेच ६७ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३४ पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात आहेत.
हवामान
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्मिम घाटातील भागांत थंड हवामान असते. जिल्ह्यात पाऊस मुख्यपणे जून ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वार्यांमुळे मिळतो, एप्रिल आणिमे महिन्यांत वळिवाचा पाऊसही पडतो. जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावड्यामध्ये वार्षिक सरासरी ५००० मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो.
उद्योग
कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे. सहकार व उद्योगधंदे - कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था... इ.) कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकूळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकूळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअर्या) या संघाच्या सभासद आहेत. जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.
पूर्वीपासूनच्या उसाच्या भरघोस उत्पादनामुळे जिल्ह्यातील गूळ उद्योगाला सुमारे १५० वर्षांची परंपरा आहे. येथील गूळ महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांतही प्रसिद्ध आहे. येथील साखरही प्रसिद्ध असून पूर्वीपासून साखरेची निर्यात केली जाते.
जिल्ह्यातील कागल, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात विडी उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.
येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लीम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.
जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.
शेती
जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यतः ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात. तांदूळ हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. प्रामुख्याने चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत ते मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. ऊस हेही जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक आहे. त्याचप्रमाणे कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दर हेक्टरी खतांचा सर्वांत अधिक वापर करणारा हा जिल्हा आहे.
सहकारी तत्त्वावर ऊस शेती ही पद्धत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २०० वर्षांपासून रूढ आहे. या पद्धतीस उसाची फड पद्धत असे म्हणतात. कोणताही लिखित कायदा, नियमावली, लेखी करार या गोष्टी नसतानाही केवळ शेतकर्याच्या परस्पर सहकार्याच्या भावनेमुळे ही पद्धत अखंडपणे चालू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही सहकारी शेती पद्धत आजही अस्तित्वात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात भात संशोधन केंद्र (राधानगरी), फळ संशोधन केंद्र (आजरा) ही उपकेंद्रे असून ऊस संशोधन केंद्र (कोल्हापूर) हे प्रादेशिक संशोधन केंद्रही कार्यरत आहे. कृषी मालाची विक्री, कृषीविषयक आवश्यक माहितीचा प्रचार यांसाठी इंटरनेटने जोडलेले देशातील पहिले गाव म्हणजे जिल्ह्यातील वारणा हे होय.
सहकारी संस्था
सहकारी चळवळीच्या बाबतीत कोल्हापूर महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सहकारी चळवळीमुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात क्रांतिकारी विकास झाला. जिल्ह्यात सुमारे ९६२४ सहकारी संस्था आहेत. जवळजवळ ३१.२१ लाख लोक त्यांचे सदस्य आहेत. सर्व संस्थांकडे मिळून एकंदर ३६४.२६ कोटी रुपयांचे भांडवल आहे. यातील २५.९५ कोटी सरकारी तर ३३८.३२ कोटी प्रत्यक्ष संस्थांचे आहेत.
विविध सहकारी संस्थांपैकी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था या मोठे काम करताना दिसतात
कोल्हापूरच्या
गादीचा इतिहास - इ.स. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला त्या वेळी
छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी
पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे
कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी १६९८ मध्ये सातार्याला
छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी
ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली.
राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर १७१० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.
करवीर
गादीची स्थापना करणार्या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी
प्रदीर्घ होती. या कालावधीत मराठी राज्यात दुही माजली होती. ताराबाई व संभाजी
महाराजांचे पुत्र शाहू यांच्यामध्ये अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्याचे केंद्र
करवीरची गादी व कोल्हापूरचा परिसरच होता. राजारामांच्या दुसर्या पत्नीचा मुलगा
दुसरा संभाजी तसेच, छत्रपती शाहू यांच्यामध्येही संघर्ष
चालू होता. १७३१ मध्ये याच परिसरात वारणा नदीच्या काठी शाहू व दुसरा संभाजी
यांच्यामध्ये तह झाला व महाराष्ट्रातील दुर्दैवी कलहाची सांगता झाली.
१७८२
मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे
त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१२ पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द)
कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र
ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा केले
नाही, त्याचे
अस्तित्त्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन
होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.
जिल्ह्यात
कोल्हापूर, जयसिंगपूर,
इचलकरंजी,
हुपरी,
यड्राव,
हातकणंगले
शिरोळ, शिरोली,
हलकर्णी
व गडहिंग्लज या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही
सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वांत मोठी वसाहत आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी या
गावाला महाराष्ट्राचे मँचेंस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग
प्रसिद्ध आहे. दी डेक्कन को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल (१९६२) व कोल्हापूर जिल्हा
शेतकरी विणकरी सहकारी संस्था (१९६२) या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सूत गिरण्या
इचलकरंजी येथे सुरू करण्यात आल्या. (काही पुस्तकांत या गिरण्या देशांतील पहिल्या
सूत गिरण्या असल्याचा उल्लेख आढळतो.)
जिल्ह्यातील
अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये, फाऊंड्रीजमध्ये
ऑईल इंजिन्स, शेतीची
अवजारे, विविध
यंत्रांचे सुटे भाग, तांब्याची व ॲल्युमिनियमची तार
इत्यादी गोष्टी बनवल्या
जातात. येथील यंत्रांची,
सुट्या
भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण,
घाना,
इजिप्त
या देशांमध्ये निर्यात केली जाते.